तारीख : 14-06-2024श्रेणी :राजकारण
तारीख : 08-04-2026श्रेणी :राजकारण
वडगाव मावळ (Vadgaon Maval) : मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत कलहाचा परमोच्च बिंदू गाठत मंगळवारी उर्वरित ४ संचालकांनीही आपल्या पदांचे राजीनामे सादर केले. त्यामुळे अवघ्या दोन दिवसांत राजीनामा देणाऱ्यांची संख्या तब्बल १३ वर पोहोचली असून बाजार समितीतील राजकीय परिस्थिती पूर्णपणे ढवळून निघाली आहे. (Maval APMC Crisis)
मंगळवारी उर्वरित संचालकांनी आपले राजीनामे वडगाव मावळ येथील सहाय्यक निबंधक Navnath Anpat यांच्याकडे सादर केले. यापूर्वी सोमवारी ९ संचालकांनी सामूहिक राजीनामे दिले होते. आता उर्वरित ४ जणांनीही त्याच पावलावर पाऊल ठेवत राजीनामे दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व संचालकांनी पदत्याग केल्याचे स्पष्ट झाले आहे.
या घडामोडींची पार्श्वभूमी नुकत्याच पार पडलेल्या बाजार समितीच्या सभापती निवडणुकीत आहे. समितीत स्पष्ट बहुमत असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा धक्कादायक पराभव झाला होता. भारतीय जनता पक्षाचे केवळ ५ संचालक असतानाही त्यांच्या उमेदवार सुभाषराव जाधव यांना ११ मते मिळाली, तर राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम कलवडे यांना केवळ ७ मते मिळाली. यामध्ये राष्ट्रवादीची ६ मते फुटल्याने पक्षाला मोठी नामुष्की पत्करावी लागली. (APMC Election Controversy)
या ‘क्रॉस वोटिंग’नंतर तालुक्यात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी उसळली होती. फुटीर संचालकांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत असताना आमदार सुनील शेळके यांनी रविवारी सर्व संचालकांची बैठक घेऊन तातडीने राजीनामे देण्याचे आदेश दिले होते.
या बैठकीला जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. आदेशानंतर केवळ दोन दिवसांत सर्व १३ संचालकांनी आपले राजीनामे सहाय्यक निबंधक कार्यालयात सादर केल्याने या प्रकरणाला निर्णायक वळण मिळाले आहे.
सहाय्यक निबंधक नवनाथ अनपट यांनी सर्व राजीनामे तातडीने स्वीकारल्याची माहिती मिळाली असून पुढील प्रशासकीय प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. दरम्यान, बाजार समितीतील या घडामोडींमुळे मावळ तालुक्यातील सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून आता पुढील टप्प्यात समिती बरखास्त होऊन प्रशासक नेमला जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तारीख : 08-04-2026श्रेणी :राजकारण
तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) : मावळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या दोन मोठ्या मेट्रो प्रकल्पांसाठी मा. मंत्री बाळा भेगडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेत मागणी केली. हिंजवडी ते तळेगाव MIDC तसेच निगडी ते लोणावळा या मेट्रो मार्गांना तातडीने मंजुरी देण्याची विनंती यावेळी करण्यात आली. (Pune Metro Expansion)
मावळ तालुक्यातील तळेगाव–नवलाख उंब्रे MIDC परिसर हा आज आशियातील महत्त्वाच्या औद्योगिक केंद्रांपैकी एक म्हणून विकसित होत असून येथे मोठ्या प्रमाणावर उद्योग उभे राहिले आहेत. या औद्योगिक विस्तारामुळे दररोज हजारो अधिकारी, कर्मचारी आणि कामगार हिंजवडी, पिंपरी-चिंचवड परिसरातून या भागात प्रवास करत आहेत. मात्र, वाढत्या वाहतूक कोंडीमुळे या प्रवासात मोठ्या अडचणी निर्माण होत असून उद्योग क्षेत्रालाही याचा मोठा फटका बसत आहे. (Hinjewadi Talegaon MIDC)
याच पार्श्वभूमीवर हिंजवडी–तळेगाव MIDC मेट्रो मार्ग उभारल्यास वाहतूक कोंडीचा मोठ्या प्रमाणात निपटारा होऊन उद्योग क्षेत्राला गती मिळेल, असे मंत्री बाळा भेगडे यांनी स्पष्ट केले. तसेच ट्रान्सपोर्ट सेवा आणि लॉजिस्टिक व्यवसायालाही याचा मोठा फायदा होणार असल्याचे मा. मंत्री बाळा भेगडे यांनी नमूद केले.
पुणे-निगडी मेट्रो प्रकल्प अंतिम टप्प्यात असताना त्याचा विस्तार निगडी ते लोणावळा असा करण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली. या मार्गामुळे मावळ तालुक्यातील पर्यटनस्थळांना मोठी चालना मिळणार असून स्थानिक अर्थव्यवस्थेला नवी उभारी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Nigdi Lonavala Metro Proposal)
या दोन्ही मेट्रो प्रकल्पांमुळे मावळ तालुक्याच्या औद्योगिक आणि पर्यटन विकासाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचे संकेत दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
दरम्यान, वाढती लोकसंख्या, औद्योगिक विस्तार आणि पर्यटनवाढ लक्षात घेता मावळसाठी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारणे अत्यावश्यक बनले आहे. त्यामुळे या ‘डबल मेट्रो’ प्रस्तावाकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून, येत्या काळात याबाबत ठोस निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
तारीख : 06-04-2026श्रेणी :राजकारण
वडगाव मावळ (Vadgaon Maval) : मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत स्पष्ट बहुमत असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसला अनपेक्षित पराभवाचा धक्का बसला आहे. पक्षातील बंडखोरी आणि क्रॉस वोटिंगमुळे अधिकृत उमेदवाराचा पराभव झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या पराभवाची गंभीर दखल घेत आमदार सुनील शेळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व १३ सदस्यांना राजीनामे सादर करण्याचा आदेश दिला आहे. (Vadgaon Maval APMC Election)
मिळालेल्या माहितीनुसार, बाजार समितीतील १८ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे १२ आणि काँग्रेस (आय)चा १ असे एकूण १३ सदस्यांचे स्पष्ट बहुमत होते. तर विरोधी भारतीय जनता पक्षाकडे केवळ ५ सदस्य होते. मात्र, सभापती आणि उपसभापती निवडणुकीत अनपेक्षित घडामोड घडली. भाजपचा उमेदवार ११ मते मिळवून विजयी झाला, तर राष्ट्रवादीच्या सहा मतांनी फुट पडल्याने पक्षाच्या उमेदवाराचा दारुण पराभव झाला.
या घडामोडीमुळे स्पष्ट बहुमत असूनही पराभव पत्करावा लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी नामुष्की सहन करावी लागली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मजबूत पकड असलेल्या पक्षासाठी हा धक्का मानला जात आहे.
तातडीने राजीनामे द्यावेत, अन्यथा पक्ष शिस्तभंगाची कारवाई - शेळके
या पार्श्वभूमीवर रविवारी (दि. ५) आमदार सुनील शेळके, जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे आणि तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्या उपस्थितीत पक्षाच्या सदस्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत आमदार शेळके यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सर्व सदस्यांनी तातडीने राजीनामे द्यावेत, अन्यथा पक्ष शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला.
या बैठकीस नामदेव शेलार, ॲड. भरत टकले, मारुती वाळुंज, दिलीप ढोरे, विलास मालपोटे, विक्रम कलवडे, अमोल मोकाशी, नथुराम वाघमारे, विलास मानकर, शंकर वाजे, सुप्रिया मालपोटे आणि अंजली जांभुळकर आदी संचालक उपस्थित होते.
दरम्यान, या आदेशामुळे संचालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून किती सदस्य प्रत्यक्षात राजीनामा देतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच भविष्यात पक्षात गद्दारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे संकेतही पक्ष नेतृत्वाकडून देण्यात आले आहेत.
तारीख : 05-04-2026श्रेणी :राजकारण
कामशेत (Kamshet) : गेल्या काही महिन्यांपासून नायगाव-येवलेवाडी परिसरात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वाढत्या डासांमुळे चिकनगुनिया व डेंगूसारख्या आजारांचा धोका निर्माण झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर कान्हे-नायगाव ग्रामपंचायतीकडून कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. (Dengue Chikungunya Risk)
परिसरात दिवसेंदिवस डासांची उत्पत्ती वाढत असताना ग्रामपंचायतीकडून नियमित फवारणी किंवा औषधांची पावडर टाकली जात नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही केवळ आश्वासन मिळत असून प्रत्यक्षात कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
अस्वच्छतेमुळे वाढला प्रादुर्भाव
नायगाव परिसरात उघडी गटारे, फुटलेले चेंबर्स आणि अपूर्ण ड्रेनेज व्यवस्था ही डास वाढण्याची मुख्य कारणे ठरत आहेत. अनेक ठिकाणी सांडपाणी रस्त्यावर साचत असल्याने त्या ठिकाणी डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच काही ठिकाणी घरातील सांडपाणी रस्त्यावर सोडले जात असून महिलांकडून भांडी घासून कचरा टाकला जात असल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. यामुळे दुर्गंधीही पसरत असून नागरिकांचे जगणे त्रस्त झाले आहे.
नागरिकांचा संताप; तातडीने फवारणीची मागणी
“कित्येक महिन्यांपासून परिसरात कोणतीही फवारणी झालेली नाही. डासांच्या त्रासामुळे आजारांचा धोका वाढला असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी,” अशी मागणी नायगाव येथील नागरिक विजय कदम यांनी केली.
गणेश चिखले यांनी सांगितले की, “ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडे वारंवार तक्रार करूनही केवळ आश्वासन दिले जाते. मात्र प्रत्यक्षात फवारणी होत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.”
प्रशासनाकडे अपेक्षा
नागरिकांनी डासांच्या निर्मूलनासाठी तातडीने औषध फवारणी, पावडर टाकणे तसेच स्वच्छता मोहिम राबविण्याची मागणी केली आहे. वाढत्या प्रादुर्भावामुळे परिस्थिती गंभीर होत चालली असून प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
तारीख : 03-04-2026श्रेणी :राजकारण
कार्ला (Karla) : पुणे जिल्हा परिषदेतील महत्त्वाच्या बांधकाम विभागाच्या सभापतीपदी मावळ तालुक्यातील खडकाळा-कार्ला गटाच्या सदस्या दिपाली दीपक हुलावळे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे मावळ तालुक्यात आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. (Pune ZP News)
या निवडीने पुणे जिल्हा परिषदेच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला गेला असून, बांधकाम विभागाच्या सभापतीपदी निवड होणाऱ्या दिपाली हुलावळे या पहिल्याच महिला ठरल्या आहेत. (Historic Appointment Maharashtra)
दिपाली हुलावळे या पीएमआरडीएच्या सदस्या असून कार्ला ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. विविध पदांवरील अनुभव आणि कार्यक्षमतेच्या आधारे त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. (Maval Political News)
निवडीनंतर प्रतिक्रिया देताना दिपाली हुलावळे यांनी सांगितले की, माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांचे आशीर्वाद, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच मावळचे आमदार सुनील शेळके यांचे मार्गदर्शन आणि सर्व पदाधिकाऱ्यांचा विश्वास यामुळेच ही संधी मिळाली आहे. (NCP Maharashtra News)
या निवडीमुळे मावळ तालुक्याला जिल्हा परिषदेत महत्त्वाचे स्थान मिळाले असून स्थानिक पातळीवर मोठे राजकीय पडसाद उमटत आहेत. आमदार सुनील शेळके यांचे तालुक्यातील वर्चस्वही पुन्हा अधोरेखित झाले असल्याची चर्चा आहे. (Maval Politics Update)
दिपाली हुलावळे यांनी पदाच्या माध्यमातून मावळ तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्यात विकासकामांना गती देण्याचे आणि नागरिकांना न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे. (Development News Pune District)